कारंजा येथील रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची निवड



वाशिम, दि. ०१ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल  कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्वप्रथम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक अ. सं. ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याची गरज आहे. स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळण्याची अपेक्षा न ठेवता अनुभवातून कौशल्य विकसित करण्यास युवकांनी प्राधान्य द्यावे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत म्हणाले, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. विविध क्षेत्रात प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी बेरोजगार युवकांनी नकारात्मक विचार बाजूला ठेऊन रोजगाराच्या संधीतून स्वतःची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा.

रोजगार मेळाव्यात जळगाव येथील नवकिसान बायो-प्लांटेड प्रा. लि., औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन, नवभारत फर्टिलायझर्स, लॉकसेफ सर्व्हिसेस व वाशिम एल. आय. सी. कार्यालय आदी उद्योजक सहभागी झाले होते. या उद्योग प्रतिनिधींनी उपस्थित युवक-युवतींना रोजगार विषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित बेरोजगार युवक-युवतींच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यापैकी २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Comments