वाशिम जिल्ह्यात उत्कृष्ट बॅडमिंटनपटू तयार व्हावेत - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक




·        राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन
वाशिम, दि. ०८ : बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण होवून जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट बॅडमिंटनपटू तयार व्हावेत. याकरिता जिल्हा क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, विजयश्री मोडक, डॉ. संदीप हाडोळे, आनंद देशमुख, वाशिम जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव नंदकिशोर इंगोले, क्रीडा अधिकारी संजय पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ८ व ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होत आहे.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, वाशिम येथे होत असलेल्या राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होवून इतर जिल्ह्यातील खेळाडूंच्या तुलनेत आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळेल. या स्पर्धेमधून जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण होण्यास मदत होईल व त्यातून अधिकाधिक चांगले बॅडमिंटनपटू घडतील, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष श्री. हेडा यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक क्रीडा अधिकारी श्री. पांडे यांनी केले. ते म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये राज्यातून सुमारे १५० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. एकेरी व दुहेरी गटात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी विविध क्रीडा संघटनांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
स्पर्धेचे औपचारिक उदघाटन झाल्यानंतर जिल्हधिकारी हृषीकेश मोडक, बॅडमिंटनपटू नेतल चरखा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सुविद्य पत्नी विजयश्री मोडक, बॅडमिंटनपटू अर्शद सय्यद यांच्या संघात प्रदर्शनीय सामना झाला. यावेळी नगराध्यक्ष श्री. हेडा यांनी नाणेफेक केल्यानंतर या सामन्याला सुरुवात झाली.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे