प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

वाशिम, दि. ०३ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, उडीद, मुग, कापूस, खरीप ज्वारी या पिकांना सर्व महसूल मंडळांमध्ये लागू आहे. तीळ या पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये तर भुईमुग पिकासाठी मालेगाव व कारंजा तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव या तालुक्यातील सर्व महसूल मंडळांकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी भरावयाचा विमा हप्ता सोयाबीन पिकासाठी ७२० रुपये, मुग व उडीद पिकासाठी ३६० रुपये, तूर पिकासाठी ५६० रुपये, कापूस पिकासाठी १८०० रुपये, खरीप ज्वारीकारिता ४८० रुपये, भात पिकासाठी ७८० रुपये, भुईमुग पिकासाठी ६०० रुपये व तीळ पिकासाठी ४४० रुपये आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दिनांक १० ऑगस्ट २०१६ पर्यंत बँकेत विमा हप्ता भरून या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी बँका, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.

Comments