कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा असून अर्ज सादर करण्यासाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून या संकेतस्थळावरील शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून ‘महा-डीबीटी’च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी ११ जानेवारी २०२१ अखेर आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे