प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना लाभार्थी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पेन्शन कार्ड वितरण





·        नाव नोंदणीसाठी जिल्ह्याभर मोहीम सुरु
·        जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम, दि. २२ : शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह ई-महासेवा केंद्रचालक व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. शंकर बाबाराव घुले, नवल बन्सीलाल जयस्वाल या शेतकऱ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पेन्शन कार्ड वितरीत करण्यात आले.
१८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात आजपासून विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट २०१९ पर्यंत ही मोहीम सुरु राहणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी केले.
१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुध्दा लाभार्थ्याद्वारे जमा केलेल्या रकमेऐवढी रक्कम जमा करण्यात येईल. गाव पातळीवर सुविधा केंद्रामध्ये (कॉमन सर्व्हिस सेंटर) लाभार्थी नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम ऑटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी सांगितले.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, गांव नमुना ८ अ व बँक पासबुक, बँक खाते क्रमांक, जन्म तारखेचा पुरावा, पत्नीचे नाव इत्यादी माहिती सोबत आणावी. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना पंतप्रधान किसान मानधन योजनेचे पेन्शन कार्ड मिळणार आहे. शेतकऱ्यांची पडताळणी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीद्वारे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे