कृषि विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर शासनाचा भर - पालकमंत्री संजय राठोड
·
महाकर्जमाफीस
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ
·
कर्जमाफीमुळे गरीब
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
·
कर्जमाफीस पात्र
ठरलेल्या ३३ शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार
वाशिम, दि. १८ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ऐतिहासिक महाकर्जमाफीचा
लाभ दिवाळीपूर्वी देण्यास सुरुवात झाल्याने गोरगरीब शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, शेतीचा विकास व्हावा, यासाठी पायाभूत
सुविधा निर्मितीवर राज्य शासनाने भर दिला असल्याचे महसूल राज्यमंत्री तथा
पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. महाकर्जमाफीच्या प्रारंभानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी
जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, निवासी उपजिल्हाधिकारी
शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके आदी उपस्थित होते. याप्रसंगी कर्जमाफीस
पात्र शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात ३३ शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते
कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पालकमंत्री
ना. राठोड म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ
करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांना ही कर्जमाफी मिळावी,
यासाठी शासन आग्रही होते. याकरिता ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. या दरम्यान कोणताही
पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सुध्दा प्रशासनामार्फत
घेण्यात आली आहे. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच देण्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी
सुरु झाल्याने गरीब शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सुमारे १
लक्ष ६४ हजार शेतकऱ्यांना महाकर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले.
शेतकऱ्यांना
कर्जमाफी दिल्यानंतर हे शेतकरी पुन्हा कर्जबाजरी होऊ नयेत, यासाठी शासनाचे प्रयत्न
सुरु आहेत. शेतीच्या विकासाठी दीर्घकालीन उपयायोजना केल्या जात आहेत. गेल्या तीन
वर्षात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मिळाला आहे. प्रलंबित असलेल्या कृषिपंप वीज जोडण्या देण्यासाठी शासनाचे प्रयत्न
सुरु आहेत. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्युत वितरण
व्यवस्था सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती केली जात आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास
शासन कटीबद्ध असल्याचे पालकमंत्री ना. राठोड यावेळी म्हणाले.
आमदार
राजेंद्र पाटणी म्हणाले, दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्याचा शब्द मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार आज कर्जमाफीस सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्याबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या
शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. राज्य शासनाने पुनर्गठीत
कर्जालाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भ, मराठवाड्यातील
शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा
उपनिबंधक श्री. कटके यांनी केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी
सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली.
महाकर्जमाफीनिमित्त
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने
अंतर्गत ऐतिहासिक महाकर्जमाफीस प्रारंभानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या
कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी
पालकमंत्री संजय राठोड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊन कर्जमाफीबद्दल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुंबई येथे झालेल्या
कार्यक्रमात जांभरूण जहांगीर येथील शेतकरी अशोक मनवर या शेतकऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment