ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल - राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया


·         प्रथमच सरपंचपदाची थेट जनतेतून निवडणूक
·         नवनिर्वाचित सदस्यांना मिळणार संगणकीकृत प्रमाणपत्र
·         आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना
·         नाम निर्देशनपत्रे, घोषणापत्रे संगणकाच्या सहाय्याने भरणे आवश्यक
वाशिम, दि. १४ : ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल करण्यात आला असून ग्रामपंचायातेच्या सदस्य संख्येनुसार नवीन खर्च मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्वच उमेदवारांना यापूर्वी २५ हजार रुपयेपर्यंत खर्च करण्याची मर्यादा होती. मात्र यामध्ये बदल करण्यात आला असून ग्रामपंचायतीच्या आकारमानानुसार निवडणूक खर्च निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ७ व ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्यपदाच्या उमेदवारास २५ हजार रुपये, ११ व १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३५ हजार रुपये व १५ व १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ५० हजार रुपये खर्च करता येणार आहे. तसेच सरपंचपदासाठी ७ व ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ५० हजार रुपये, ११ व १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १ लक्ष रुपये व १५ व १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये १ लक्ष ७५ हजार रुपयेपर्यंत खर्च करण्याची मुभा राहणार असल्याचे निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी सांगितले.
श्री. सहारिया म्हणाले की, यावेळी प्रथमच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला त्यांच्या प्रभागातील सदस्यपदाच्या उमेदवारांसोबतच सरपंचपदाच्या उमेदवारासाठी एक मत द्यावे लागणार आहे. मतदान यंत्रावर (ईव्हीएम मशिन) लावण्यात येणाऱ्या  बॅलेट पेपरमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी फिकट गुलाबी, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी फिकट हिरवा, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी फिकट पिवळा, सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी पांढरा बॅलेट पेपर वापरला जाणार असून सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी फिकट निळा बॅलेट पेपर वापरला जाणार आहे.
संगणकीकृत नामनिर्देशनपत्रे, घोषणापत्रे सादर करणे आवश्यक
            ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. १५ ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. नामनिर्देशनपत्रे व घोषणापत्रे संगणकीकृत असणे आवश्यक असून राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवरून उमेदवारांना आपले अर्ज, घोषणापत्रे भरता येतील. सेतू, महा ई-सेवा केंद्रांमधून सुध्दा उमेदवारी अर्ज भारता येणार आहेत. संपूर्ण अर्ज, घोषणापत्र भरल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढावी, तसेच त्यावर स्वाक्षरी करून हा अर्ज दि. २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अंतिम दिवशी ऑनलाईन अर्ज भरताना होणारी धावपळ टाळण्यासाठी उमेदवारांनी दि. १५ सप्टेंबरपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संगणकीकृत अर्ज, घोषणापत्राची प्रिंट काढल्यानंतर ती उमेदवारांच्या सोयीने दि. २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करता येईल, असे श्री. सहारिया म्हणाले. तसेच या निवडणुकीमध्ये विजयी होणाऱ्या सर्व उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाकडून आयोगाकडून संगणकीकृत प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी पथके
वाशिम जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ ऑक्टोंबर २०१७ रोजी होत असून या निवडणुका पारदर्शकपणे व निर्भय वातावरणात होण्यासाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर करण्यासह इतर अनुषंगिक उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे. दारूचे वाटप, पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन केली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी यावेळी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे