फुटबॉल खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



·        जिल्ह्यातील मुख्याध्यापक, फुटबॉल संघटनांची सभा
वाशिम, दि. ०६ : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा)१७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोंबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. या अनुषंगाने देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘मिशन-इलेव्हन मिलियन’ अभियान सुरु केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अभियान सुरु करण्यात आले असून यामाध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी आपल्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित जिल्ह्यातील मुख्याध्यापक व फुटबॉल संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. नागरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, खेळामुळे शरीर सदृढ व निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येकाने किमान एका तरी क्रीडा प्रकारात रुची निर्माण केली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडा प्रकारांविषयी आवड निर्माण करून त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष दर्जाचे खेळाडू घडतील. त्यामुळे सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका तरी खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. तसेच दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’मध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.

प्रास्ताविकमध्ये श्री. पांडे यांनी ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’विषयी सविस्तर माहिती दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. नागरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे