‘रुरल मार्ट’ प्रत्येक जिल्ह्यात असावे - ॲड. यशोमती ठाकूर
·
कारंजा
येथील रुरल मार्टला भेट
वाशिम, दि. ०८ (जिमाका) : बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी
भागातील महिला संघटीत झाल्या आहेत. आता त्या उद्योग-व्यवसाय करीत आहे. त्यांनी उत्पादित
केलेले खाद्यपदार्थ आणि वस्तू ह्या रुरल मार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध झाल्या
आहेत. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी आणि महिला आर्थिकदृष्ट्या
स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी असे रुरल मार्ट प्रत्येक जिल्ह्यात असावेत, असे मत महिला
व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.
आज
८ जुलै रोजी कारंजा येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड पुरस्कृत
महिला आर्थिक विकास महामंडळ, वाशिम द्वारा संचालित महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे विक्री केंद्र
असलेल्या ‘रुरल मार्ट’ला ॲड. श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या.
‘नाबार्ड’चे
जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे,
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन
मोहुर्ले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी
राजेश नागपुरे, कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव,
तहसिलदार धीरज मांजरे व गटविकास अधिकारी कालिदास तापी यांची यावेळी प्रमुख
उपस्थिती होती.
ॲड.
श्रीमती ठाकूर याप्रसंगी म्हणाल्या,
महिलांच्या विकासासाठी ‘नाबार्ड’ने रुरल मार्टच्या माध्यमातून स्तुत्य
असा उपक्रम राबविला आहे. बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्य आणि वस्तूंना
हक्काची बाजारपेठ या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. निश्चितच रुरल मार्टमुळे बचतगटातील
महिलांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या
प्रकल्पाबाबत ॲड. श्रीमती ठाकूर यांना माहिती देतांना नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक
श्री. खंडरे म्हणाले की, २४ महिन्यांच्या कालावधीसाठी नाबार्डच्या वित्तीय सहभागातून पथदर्शी प्रकल्प
म्हणून रुरल मार्टला सहाय्य केले आहे. जिल्ह्यातील बचतगटातील सर्व महिलांना याचा फायदा
होणार आहे. कोरोनाच्या काळात रुरल मार्टमधून बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची
मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. महिन्याकाठी रुरल मार्टला १५ ते २० हजार रुपये मासिक
उत्पन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘माविम’चे
जिल्हा समन्वय अधिकारी श्री. नागपुरे यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या जिल्ह्यातील ८६ बचतगटांनी उत्पादित केलेल्या
वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हातमागावर बनविलेल्या वस्तू देखील विक्रीला आहेत.
केवळ बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचीच येथे विक्री होत असल्याची माहिती ठाकूर
यांना दिली.
लोकसंचालीत
साधन केंद्राच्या अध्यक्ष कुमुद उखळकर, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, अल्पसंख्यांक
लोकसंचालित साधन केंद्र कारंजाचे व्यवस्थापक विजय वाहने, ग्रामीण
लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक शेखर खोडवे, कार्यक्रम
अधिकारी प्रांजली वसाके, लेखापाल बेबी टोंग, सहयोगीनी अनिता गवई, सविता पाईकराव, सुनीता डोईफोडे, वर्षा डाखोरे, मुन्नी नंदावले, वनिता गजभार, देवकाबाई
काकड, रत्नप्रभा विभूते तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील महिला
बचतगटांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची यावेळी उपस्थिती
होती.
Comments
Post a Comment