पीक कर्जविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक बँकेने तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक करावी - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा



·         बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा आढावा
·         ५० हजार रुपयेपर्यंतच्या कर्जाला नो-ड्युजची गरज नाही
·         प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार कर्ज द्या
वाशिम, दि. २९ : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या पीक कर्जविषयक तक्रारींचे निराकरण तातडीने होण्यासाठी सर्व बँक शाखांमध्ये तक्रारी निवारण अधिकाऱ्यांची नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. आतापर्यंत झालेल्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे विकास प्रबंधक विजय खंडरे यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देऊनही यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा तक्रारी संबंधित बँक शाखेतच सोडविल्या जाऊन शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता सर्व बँक शाखांमध्ये पीक कर्ज विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसेच या अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक बँकेच्या दर्शनी भागात लावावा.
पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होता कामा नये. सर्व बँकांनी शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक देऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे. ५० हजार रुपयेपर्यंतच्या पीक कर्जासाठी नो-ड्युजची आवश्यकता नाही, त्याऐवजी शेतकऱ्याचे स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरून त्याला ५० हजार रुपये पर्यंतचे पीक कर्ज देण्यात यावे. पीक कर्जाविषयी आवश्यक कागदपत्रांची यादी सर्व बँकांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. तसेच पीक कर्जाचे वाटप करताना स्केल ऑफ फायनान्सपेक्षा कमी पीक कर्ज वितरीत केले जाणार नाही, याची खबरदारी सर्व बँकांनी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
५० हजार रुपयेपर्यंत पीक कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१) सातबारा, २)  आठ अ उतारा, ३) फेरफार नोंदी, ४) आधारकार्ड, ५) मतदान ओळखपत्र अथवा रेशनकार्ड, ६) दोन पासपोर्ट फोटो, ७) बचत खाते पासबुकची झेरोक्सप्रत
स्केल ऑफ फायनान्सनुसार प्रति हेक्टरला असे होणार कर्जवाटप
१) कापूस – ४० हजार रुपये , २) ज्वारी- २५ हजार रुपये, ३) तूर- ३० हजार रुपये, ४) सोयाबीन- ४० हजार रुपये, ५) मुग- १८ हजार रुपये, ६) उडीद- १८ हजार रुपये, ७) भुईमुग- ३० हजार रुपये, ८) सुर्यफुल- २२ हजार रुपये, ९) तीळ- २२ हजार रुपये.
*****
सोबत फोटो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे