मराठी भाषा दिवसानिमित्त विशेष लेख:मानवतावादी मराठी दिवस
मराठी भाषा दिवसानिमित्त विशेष लेख:
मानवतावादी मराठी दिवस
अर्वाचीन मराठी साहित्यात विपुल व विविधांगी वाङ्मयनिर्मिती करणारे आणि वाङ्मयीन मूल्यांबरोबरच जीवनमूल्यांची जपणूक करणारे कुसुमाग्रज हे महान लेखक म्हणून महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. त्यांच्या जन्मदिनी, अर्थात २७ फेब्रुवारीला 'मराठी भाषा दिवस' साजरा केला जातो. मराठीमध्ये अनेक कवी, लेखक होऊन गेलेत. त्यांपैकी काही मनोरंजनवादी, काही प्रेमवादी, तर काही निसर्गवादी होऊन गेलेत; परंतु मानवतावादी फारच कमी झालेत, त्यातलेच एक कुसुमाग्रज हे आहेत. ज्यांच्या साहित्यामध्ये मानवतेचा गजर असतो. मानवासाठी साहित्यनिर्मिती करणारा साहित्यिक हा निश्चितच थोर असतो आणि त्या मराठीसाठी, मराठी भाषिकांसाठी लेखन केलं ती मराठीसुद्धा थोर आहे.म्हणून त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिवस केवळ 'भाषा दिवस' नसून तो 'मानवतावादी मराठी भाषा दिवस' आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
त्यांची माणसांसाठी लिहिलेली कविता अग्नीप्रमाणे दाहक, ऊबदार आणि तेजस्वी आहे. त्यांच्या कवितेपासूनच अग्नीसंप्रदायाची सुरुवात झाली. त्यांना दलित, शोषितांविषयी जिव्हाळा होता. त्यांच्या कवितेला क्रांतीचा ध्यास होता. मानवतावादी ही मौलिक तत्त्वं त्यांनी स्वीकारली होती. काव्यातील नाट्यमयता ही वेगळी परंपरा त्यांनी सुरू केली. प्रकाशाची ओढ, उदंड आशावाद, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि जीवनमूल्यांवरील अढळ निष्ठा ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्यं आहेत. दुःखी, पिडितांविषयी त्यांना अपार करुणा होती. कुसुमाग्रज हे सूर्य व प्रकाशाचे पूजक होते. कवितेप्रमाणेच नाटकांतही त्यांची काव्यप्रतिभा पावलोपावली दिसते. स्वातंत्र्य, भाषांतरित, पौराणिक व ऐतिहासिक नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत.
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी विविध प्रकारचं साहित्यलेखन केलेलं आहे. काव्य, नाटक, कथा, चित्रपटकथा, कादंबरी, लघुनिबंध, ललितगद्य, बालसाहित्य इ. आत्मचरित्रावर त्यांनी लेखन केलेलं नाही; परंतु काही ललित लेखनाच्या माध्यमातून त्यांच्या चरित्रविषयी माहिती मिळते. त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांच्या वामन नावाच्या काकाला मूल नव्हतं. गजाननला वामनकाकांना दत्तक दिलं गेलं. दत्तक गेल्यावर गजाननचं नाव विष्णू ठेवलं गेलं. म्हणून ते विष्णू वामन शिरवाडकर या नावानं ओळखले जाऊ लागले. कविता लिहीत असताना त्यांनी गोविंदाग्रजांप्रमाणे कुसुमाग्रज (कुसुमपेक्षा अग्रज असलेला भाऊ) असं नाव धारण केलं. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये पुणे इथं झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण पिंपळगाव, माध्यमिक शिक्षण त्यानंतरचं नाशिक इथं झालं. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. १९३३ मध्ये 'जीवनलहरी' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९४४ मध्ये मनोरमाशी त्यांनी आंतरजातीय विवाह केला. एकूणच त्यांचा जीवनप्रवास संघर्षमय राहिलेला आहे.
कुसुमाग्रजांनी माणसांसाठी कविता लिहिलेली आहे. त्यांतल्या त्यात गरीब माणूसच त्यांच्या कवितेचा विषय राहिलेला आहे. 'समिधा' नावाच्या कवितेत ते लिहितात_
'समिधाच सख्या या
त्यात कशाचा ओलावा
कुठूनी फुलापरी मकरंद मिळावा
जात्याच त्या रुक्ष
एकच आकांक्षा
तव अंतरअग्नी
क्षणभर तरी फुलवावा!'...
अर्थात, माझी कविता समिधासारख्या रुक्ष असलेल्याच लोकांच्या जीवनाचे वर्णन करते. फुलाप्रमाणे आनंदानं बरबटलेल्या लोकांचं वर्णन करीत नाही. रुक्ष लोकांच्या जीवनात आनंद पेरणं हाच एकमेव उद्देश आहे. 'बळी' नावाच्या कवितेतील तरुण मुंबईला नोकरी शोधायला जातो. नोकरी तर मिळतच नाही; परंतु नोकरीसाठी वणवण फिरताना शेवटी जीव जातो. कुसुमाग्रज लिहितात,
'भेकडांनो या इथे साधण्याला पर्वणी
पेटवा येथे मशाली अन् झडू द्या चौघडी.'
मशाली पेटवा, चौघडी घडू द्या, क्रांती करा याशिवाय परिवर्तन होणार नाही. गरिबांचं जीवन बदलणार नाही. 'पाचोळा' ही कविता शीर्षकावरून खूप काही सांगून जाते. गोरगरिबांचं जीवन म्हणजे पाचोळा. पाचोळ्याची काय किंमत असते, गरिबीचं जीवनही पाचोळ्यासारखंच. कवी म्हणतात_
'आणि अंती दिन एक त्या वनात
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेऊनी तयाते
उडवूनि त्या दूर दूर कुठे
"आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतूनी पर्णराशी."
पैशाला नव्हे, तर माणसाला किंमत असली पाहिजे. गरिबांच्या जीवनाचा, त्यांच्या भावनेचा कोणीच विचार करीत नाही. त्यांनाही श्रीमंतांसारखं जगावं वाटते. गाडी, माडी त्यांच्याजवळही असावी असं त्यांना वाटते; परंतु होते उलटच. 'माळाचे मनोगत' या कवितेतील ओळी खूपकाही सांगून जातात_
'वाटते बुलबुल, कोयल यावे
मंजुळ संगीत तयांनी गावे
जीवन जाणिवा सारी
विरावी घटकाभरी
येऊन कधी तो घुबड मात्र
भीषण भासावी अधिक रात्र
कशास आयुष्य, देवा इतुके
शतकामागूनी जाती शतके.'
गोरगरिबांचा कोणीच वाली नाही. त्यांच्या भावना, संवेदना पायदळी तुडविल्या जातात. मी तर असं म्हणेन की त्यांचं भलं होऊच नाही यासाठी खतरनाक नीती आखली गेली. 'मेख मारली गेली' ह्या माझ्या कवितेतील ओळी महत्त्वपूर्ण वाटतात,
'तुझ्यासाठी आत्मनिर्भर
मन की बात, तुझ्या छातीत लाथ
गोड बोलून तुझीच वाट लावली गेली
कधीच रे निघणार नाही
अशी मेख मारली गेली. '
दुबळा माणूस पिढ्यान् पिढ्या त्याच मरगळलेल्या अवस्थेत जगतो. तरीही तो समाजातील नीतिमत्ता, संस्कृती, संस्कार जोपासतो. सावकार चार पैशांसाठी त्याच्या अब्रूवर हात घालतो. तो अतिशय हवालदिल होतो. 'लिलाव' नावाच्या कवितेत सावकार एका कर्जदार शेतकऱ्याच्या घरी ऐन हंगामात कर्ज वसूल करायला जातो. बारा महिने मेहनत करून पिकवून आणलेल्या पिकाची हराशी करतो. तेवढ्यानं त्याचं मन शांत होत नाही. शेकड्यांवर शेकडे लावल्यानं दरवर्षी कर्ज वाढतच जाते. घरातील गाडगी, मडक्यांची बोली लावली जाते. शेतकरी खाली मान घालून दारात उभा. प्रचंड उदासीनता त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली. त्याची कारभारीन बाळ रडत असल्यानं घराच्या कोपऱ्यात बाळाला पाजते. तेवढ्यात सावकाराचं लक्ष तिच्याकडं जाते,
'भुके अर्भक कवळूनी उरास
पदर टाकून त्या घेई पाजण्यास
उर उघडे ती तिचे न्हाळूनी
थोर थैलीतील वाजवीत नाणी
आणि हिरे पुसतसे सावकार
उडे चहुकडे हास्याचा विखार.'
अशा कितीतरी कवितांमधून गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या विदारक जीवनाचं वर्णन कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. अशा महान ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवीच्या जन्मदिनाच्या दिवशी 'मराठी भाषा दिवस' साजरा करणं खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणून माझ्या दृष्टीनं अनेक मराठी संत, महात्मे आणि कुसुमाग्रजांसारख्या श्रेष्ठ कवींनी मराठी भाषेमधून मानवता जोपासल्यामुळे आजचा दिवस केवळ मराठी भाषा दिवस नव्हे तर मानवतावादी मराठी भाषा दिवस आहे असं म्हणणं संयुक्तिक असेल.
कुसुमाग्रजांची मराठीइतकीच इंग्रजीसुद्धा चांगली होती. तरीही त्यांनी जवळपास सर्वच लेखन मराठीतून केलेलं आहे. मराठीचा त्यांना सार्थ अभिमान होता. तिच्या प्रगतीसाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आहेत. एका कवितेत ते म्हणतात_
'माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या- खोऱ्यातील शिळा.'
मराठीचा टिळा ललाटास लावून मराठीचा जागर केला पाहिजे, मराठीची समृद्धी वाढविली पाहिजे; परंतु तसं होताना दिसत नाही. कितीतरी ठिकाणी, कैकदा मराठीची अवहेलना होते. कुसुमाग्रज म्हणतात,
'माझ्या मराठी मातीला नका म्हणू
हीन दीन
स्वर्गलोकाहूनही थोर मला हिचे
महिमान
रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी
चारी वर्गातूनी फिरे सरस्वतीची पालखी. '
आपण सर्वांनी प्रयत्न केले तर सरस्वतीची पालखी चारी वर्गातून फिरत राहील. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. आता नक्कीच मराठीचा गोडवा अमृताची पैजा जिंकल्याशिवाय राहणार नाही. संत नामदेवांनी मराठीचा झेंडा पंजाबपर्यंत नेऊन फडकविला होता. परंतु यावर्षी दिल्ली दरबारी ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाल्यानं मराठी दिल्लीपर्यंत पोहोचली. विदेशातही ती ताठ मानेनं उभी आहे. मराठीचा ज्ञानदीप आपण जगी लावत आहोत ही अभिमानाची बाब आहे.
कुसुमाग्रजांच्या अंतर्बाह्य मराठी होती. विशेषतः मराठी कविता होती म्हणूनच ते म्हणतात,
'तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता
तेव्हा माझ्याशी बोलू नका
कारण
माझ्या कवितेत मी असेल
बराचसा बहुदा!'
कुसुमाग्रजांचं सारं जीवन त्यांच्या कवितेमधून व्यक्त होते. त्यांची कविता सामान्यांची कविता आहे. हजारोंची दुःखं त्यांच्या कवितेमधून व्यक्त होतात. त्या अशा पटलावर जगत होते. त्यांचं जीवन हे सार्वजनिक झालेलं होतं. हजारोंशी त्यांचं नातं जुळलं होतं.
'हजारों डोळ्यांमधले पाणी
माझ्या डोळ्यांमध्ये साचे
हजारो कंठातील घोषणा
माझ्या कंठामध्ये घुमे
हजारो संगे माझे जडले आहे नाते.'
एखाद्या ऋषीसारखं जीवन त्यांनी माणसासाठी समर्पित केलं होतं. लोकांच्या वेदना बघून ते हळहळत. आपोआप दुसऱ्यांचं दुःख त्यांचं होत होतं. 'लोकांचे कल्याण | संतांची विभूती |' अशी त्यांची अवस्था झाली होती. 'छंदोमयी' नावाच्या कवितेतील शब्द फारच बोलके आहेत_
'मातीपण मिटता मिटत नाही
आकाशपण हटता हाटत नाही
आकाशमातीच्या संघर्षात
माझं जखमाचं देणं
फिटता फिटत नाही.'
मानवाला सुखानं जगता यावं यासाठी त्यांचं मन तीळतीळ तुटत होतं. त्यांचं हृदय रडत होतं. सर्वांच्या जाणिवा त्यांच्या हृदयात घट्ट घर करून बसल्या होत्या. 'जाणीव' नावाच्या कवितेतील शब्द काळजाला हात घालतात_
'मला होते जाणीव एक क्षणभर
मी नाही अनेकांतील एकमेव
तर आहे केवळ अनेकांतील एक
सर्वातील, सर्वांचा आणि सर्वांसाठी!'
जगाच्या कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या कुसुमाग्रजांनी जवळपास १०० ग्रंथांची निर्मिती केली. कवीप्रमाणेच ते नाटककार म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते. नटसम्राट, कौंतेय, ययाती आणि देवयानी, विदूषक, मुख्यमंत्री अशी कितीतरी नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. कादंबरी, बालसाहित्य, ललित साहित्य, आदी मराठी साहित्यातील सर्वच प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांचा मृत्यू १० मार्च १९९१ रोजी झाला. आज तात्यासाहेब आपल्यात नाहीत; परंतु कार्याच्या रूपानं ते जिवंत आहेत. तेच म्हणतात_
'जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतामधून राहीन मी!'...
_ डाॅ. विजय जाधव
राजस्थान महाविद्यालय, वाशिम
संपर्क: ९८८१५२७६६०
Comments
Post a Comment